महाराष्ट्रराजकारण
Trending

नोटबंदीवरून राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं ! त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरेवर मांडल स्पष्ट मत, महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लिम एकोपा आढळतो !!

नाशिक, दि. २० – नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर ही वेळ आली नसती. २ हजार रुपयांच्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या. म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? असा जळजळीत सवाल उपस्थित करून केंद्र सरकारच्या कामकाजावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यावर उरूसावेळी तिथे जी चादर चढवली जाते ती माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चढवतो.

इतर धर्माचा कुणी माणूस आपल्या धर्मात किंवा धर्मकार्यात आला तर लगेच धर्मभ्रष्ट व्हायला हिंदू हा इतका कमकुवत धर्म आहे का? मीही अनेक दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये गेलोय. आपल्याच धर्मात फक्त काही जातीनांच गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. असले वाद घालणारी लोकं कोत्या मनोवृत्तीची. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांनी त्या वादावर बोलावं बाहेरच्यांनी यात काही पडायची गरज नाही. ह्यात कुणाला दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्या गोष्टी चुकीच्या त्या चुकीच्याच. म्हणून मी त्रास देणाऱ्या मशिदींवरच्या भोंग्यांवर बोललो. माहीम समुद्रातील मजारीवर बोललो… गडकिल्ल्यांवर पण काही ठिकाणी अनधिकृत दर्गे उभे राहतात तेही हटवलेच पाहिजेत. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून दंगली घडवायला काहीतरी खोदून काढायचं हे योग्य नाही, असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.

आतापर्यंतचा महाराष्ट्रात जिथे मराठी मुस्लिम राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत, कारण ते पिढानपिढ्या ते महाराष्ट्रात राहतात, मराठीत बोलतात. अशा ठिकाणांमद्ये जे सामंजस्य आहे ते विनाकारण बिघडवू नका. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये जर ‘हिंदू खतरे में है’ असं म्हटलं तर कसं होईल? निवडणुका जवळ आल्या की हा धार्मिक उन्माद वाढत जाईल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

कोकणात हजारो एकर जमिनी कोकणवासियांना फसवून विकत घेतल्या जात आहेत. दलाल, अधिकारी यांच्या संगनमताने जमिनी गिळल्या जात आहेत. जैतापूरचा प्रकल्पाचं काय झालं? काहीच नाही. ती कंपनी बुडाली. तिथे जमीन विकत घेतलेली आहेच मग तिथे का नाही नेत तो प्रकल्प?

कोकणी भूमिपुत्राकडून दलालांनी, धनदांगडग्यांनी जमिनी जिथे विकत घेतल्या आहेत तिथे प्रकल्प नेतात आणि मग सरकारकडून हजार पटीने भाव काढून घेतात. मग प्रकल्प झाला काय आणि नाही झाला काय यांना काहीच फरक पडत नाही.

मी कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रिया दिली तर भाजप म्हणतं, “आमच्याबाबतीत कुणीही बोलू नये.” म्हणजे हे कशाच्याही बाबतीत बोलणार पण ह्यांच्याबाबतीत कुणी बोलायचं नाही. हा कोणता उद्दामपणा ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

देशात ईडी-काड्यांचे व्यवहार फार सुरु आहेत. एक लक्षात ठेवा कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही, उद्या दुसरं सरकार येईल तेव्हा ते दामदुपटीने बदला घेतील म्हणून सत्ताधाऱ्यांनी चुकीचे पायंडे पाडू नयेत, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Back to top button
error: Content is protected !!