छत्रपती संभाजीनगर
Trending

कृषिपंपाचे वीजबिल भरा आणि ३० टक्के सवलत मिळवा, कृषी वीज धोरणाचा लाभ घेण्यासाठी उरले केवळ तीन दिवस !

येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार

Story Highlights
  • शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी वीज धोरणात कृषिपंपाचे वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे.

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ : कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत कृषी वीज धोरणाची दोन वर्षे निघून गेली. परंतु महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत व्याज, विलंब आकारात माफी यासह सुधारीत थकबाकीत ३० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे ३ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी वीज धोरणात कृषिपंपाचे वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत कृषी वीज धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी, तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सूट देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना महावितरणच्या कृषी धोरणाबाबत माहिती देऊन सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धोरण पोहोचले आहे, परंतु ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे दोन वर्षे निघून गेली असून, आता फक्त दुसऱ्या वर्षाचे ३ दिवस उरले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजन केल्यानंतर सुधारित थकबाकीच्या १६२२.९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शेतकऱ्यांना सुधारीत थकबाकीच्या केवळ ७० टक्के रक्कम आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहे. आतापर्यंत योजना सुरु झाल्यापासून जिल्ह्यात १ लाख ३८१ शेतकऱ्यांनी ७३ कोटी १० लाख रुपये भरले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही ३१ मार्चपर्यंतची वाट न पाहता आजच आपले वीजबिल भरून सवलतीसह थकबाकीमुक्तीचा लाभ घयावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!