मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल; वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करून कडक कारवाई करणार; विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा !
मंत्रालयातील शिपाई कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, फसवलेल्या तरुणांना न्याय द्या - अजित पवार

नागपूर, दि. ३० डिसेंबर – मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या भूमिकेची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचे नाटक घडवून आणले.
यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe