छत्रपती संभाजीनगर

अजिंठा अर्बन बॅंकेतील ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी: पहिल्या टप्प्यात ५२ ठेवीदारांच्या खात्यावर १४ लाखांची क्लेम रक्कम जमा !!

९७.४१ कोटींचा घोटाळा, ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नसून ५ लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८- अजिंठा अर्बन को.ऑप. बॅंकेतील ठेवीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५२ ठेवीदारांच्या खात्यावर १४ लाखांची क्लेम रक्कम जमा झाली आहे. यामुळे एकूण १३ हजार ५०० क्लेम केलेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या बॅंकेला विम्याचे कवच असल्याने ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नसून ५ लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित असल्याचा दावा बॅंकेकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५२ ठेवीदारांचा क्लेम मंजूर करण्यात आला असल्याचा ईमेल Reserve Bank of India ने अजिंठा अर्बन को. ऑप. बँकेला दि. २३ नोव्हेंबर रोजी पाठवला आहे. ज्या ठेवीदाराची क्लेम रक्कम ९२ हजार रुपयांच्या आत आहे अशा ५२ ठेवीदारांचा क्लेम पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. टप्प्या टप्प्याने पाच लाख रुपयांपर्यंतचे क्लेम रिलिज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याशिवाय अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर काम करत असून पोलिसांनी बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आले असून यातील काही कर्जदारांच्या केवायसीच पोलिसांना मिळाल्या नसल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. कर्जदारांच्या या फाईलीचे संपूर्ण रेकॉर्ड मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. असुरक्षित कर्जदारांची KYC सदर्भातील संपूर्ण माहिती पोलिस शोधत आहे.

यासंदर्भात अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना सुरुवातीला अटक केलेली आहे. त्यानंतर उस्मानपुरा, जाधवमंडी येथील दोन शाखा व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.

अजिंठा अर्बन बँकेतील ठेवीदारांनों घाबरू नका, ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित ! बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांची स्पेशल मुलाखत !!

सहकारी पतसंस्था व नागरी बॅंकांचे एकापाठोपाठ घोटाळे समोर येत असून अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. तत्पूर्वी RBI ने व्यवहारावर घातलेल्या निर्बंधामुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, ठेवीदारांना क्लेमची रक्कम मिळेल. त्यामुळे कुठल्याही ठेवीदारांनी पॅनिक होवू नये. पाच लाखापर्यंतच्या ठेव रकमा सुरक्षित असून सर्व ठेवीदारांना त्या मिळतील, असा दिलासा अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी सुरुवातीलाच दिलेला आहे. यासंदर्भात संभाजीनगर लाईव्हचे मुख्य संपादक सुधीर जगदाळे यांनी काकडे यांची स्पेशल मुलाखत घेतली. साधारण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५ लाखांपर्यंच्या ठेवीची रक्कम ठेवीदारांच्या खात्यात जमा होण्याची शक्यताही काकडे यांनी सुरुवातीला  व्यक्त केली होती. त्या दृष्टीने बॅंकेचे कर्मचारी अहोरात्र, काम करत असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटी पहिल्या टप्प्यातील क्लेमची रक्कम ५२ ठेवीदारांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवीदारांचे क्लेम सादर केले- अजिंठा नागरी सहकारी बँकेला रिझर्व बँक ऑफ इंडिया नागपूर यांच्याकडून 28/8/2023 रोजी बँकेला AID (ऑल इन्क्लूजिव्ह डायरेक्शन) लागू करण्याबाबत पत्र दिलं. सदरचे डायरेक्शन हे 29/8/2023 पासून लागू करण्यात आलेले आहेत. आणि त्या तारखेपासून 45 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला सर्व ठेवीदारांचे मॅक्झिमम पाच लाखापर्यंतचे ठेव रक्कम हे DICGC कडे क्लेम स्वरूपात सादर करायचे होते. ही क्लेम करायची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर २०२३ होती. 13 तारखेलाच आपण सर्व प्रकारच्या ठेवी सर्व ज्यांचे विलिंगनेस आलेले असतील नसतील वगैरे अशा सर्व ठेवीदारांचे क्लेम आपण DICGC दिलेले आहेत.

पाच लाखांवरील ठेवीची रक्कम मिळण्याची अशी असेल प्रोसेस- पाच लाखापर्यंतचे सर्व क्लेम केल्यानंतर बँक कर्जदारांकडील रिकव्हरीची प्रोसेस सुरू करेल. म्हणजे ज्या कर्जदारांकडे थकीत असलेल्या कर्जाची रक्कम वसुल करणार. रिकवरीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा DICGC कडून जी क्लेम स्वरूपात रक्कम घेऊ ती रक्कम DICGCला  परत केल्यानंतर उर्वरित जी रक्कम शिल्लक राहणार आहे त्या पाच लाखांच्या वरील ठेवीदारांना परत केल्या जातील.

बॅंकेत एकूण 47 हजार अकाउंट, ३५० कोटींच्या ठेवी- साधारणत: प्राथमिक स्वरूपामध्ये 47 हजार अकाउंट आहेत. ३५० कोटी पर्यंतच्या एकूण ठेवी आहेत. ज्या तारखेला एआयडी लागलेला आहे. त्या तारखेची ही परिस्थीती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट मुदत ठेवी पुन:गुंतवणूक या सगळ्या प्रकारच्या ठेविचा त्यामध्ये समावेश आहे.

टप्प्या-टप्याने व पॅरलल यंत्रणा काम करतेय- सध्या रिकव्हरीचे टप्पे सुरुच होणार आहेत. आता पहिला टप्पा क्लेमचा आहे. त्यानंतर कर्जाची वसुली करणे आदी पॅरलल ही यंत्रणा सुरुच होणार आहे. अर्थात क्लेमचा पहिला टप्पा आता बॅंकेच्या बाजून अंतिम टप्प्यात असून तो DICGC कडे सादर करण्यात आलेला आहे.

प्रथम माहिती अहवालानुसार असे आहे बॅंकेतील घोटाळ्याचे स्वरुप- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!