महाराष्ट्र
Trending

जालना जिल्ह्यात महावितरणचा कारवाईचा धडाका ! वीजचोरीप्रकरणी आठ महिन्यांत 522 जणांवर गुन्हे दाखल !!

वीजचोरांचे धाबे दणाणले

जालना, दि. ९ : वीजचोरीविरोधात जालना जिल्ह्यात महावितरणने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या आठ महिन्यांत आकडे टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या तब्बल 522 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी परिमंडलातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांत वीजचोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच प्रत्येक महिन्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सलग काही दिवस केवळ वीजचोरीविरोधातील धडक मोहीम राबवण्यात येते. जालना जिल्ह्यातही मुख्य अभियंता डॉ.केळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या मोहिमांत वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या आठ महिन्यांत ‍जालना ‍जिल्ह्यात तब्बल 522 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वीजचोरांनी 3 लाख 87 हजार 376 युनिट ‍विजेची चोरी केली आहे, ज्याची रक्कम 71 लाख 56 हजार 495 रुपये एवढी आहे. जालना शहर उपविभागात 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 9 लाख 71 हजार 165 रुपयांची 53406 युनिट वीजचोरी केली. जालना ग्रामीण उपविभागात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 95 हजार 250 रुपयांची 4094 युनिट वीजचोरी केली.

भोकरदन उपविभागात 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 5 लाख 96 हजार 472 रुपयांची 37914 युनिट वीजचोरी केली. जाफ्राबाद उपविभागात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 63 हजार 713 रुपयांची 5311 युनिट वीजचोरी केली. अंबड उपविभागात 122 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 14 लाख 31 हजार 948 रुपयांची 82529 युनिट वीजचोरी केली. घनसावंगी उपविभागात 99 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 15 लाख 5 हजार 538 रुपयांची 76182 युनिट वीजचोरी केली. मंठा उपविभागात 95 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 9 लाख 90 हजार 730 रुपयांची 41841 युनिट वीजचोरी केली. परतूर उपविभागात 99 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी 15 लाख 1 हजार 679 रुपयांची 86099 युनिट वीजचोरी केली.

आकडेबहाद्दरांसह मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवरही महावितरणचे लक्ष आहे. वीजचोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल दिले जाते. तसेच दंड (कंपाऊंडिंग चार्जेस) आकारला जातो. वीजचोरीचे निर्धारित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते.

तथापि, विहित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!