महाराष्ट्र
Trending

कृषी विभागात पदभरती, लिपीकासह विविध जागांसाठी अर्ज करण्यास 10 दिवसांची मुदत !

मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी दि.०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली करण्यात येणार असून जे उमेदवार यापूर्वी अर्ज करु शकले नाहीत, ते उमेदवार सदर कालावधीत अर्ज करु शकतील. तथापि जाहिरातीतील नमूद केलेल्या वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, पात्रता, परीक्षा शुल्क इतर सर्व संदर्भातील अटी व शर्ती कायम राहतील, असे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कळविले आहे.

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहिराती दि.०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.

या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्यासाठीचा अंतीम दिनांक ३० एप्रिल, २०२३ असा होता.मात्र, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने दि. ४ मे, २०२३ रोजी शासन निर्णय जारी करुन खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द केली. या शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक २९.९.२०२२ नंतरच्या पदभरतीसाठी अमलात येतील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रणालीमध्ये जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरीता अर्ज करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती पाहता तसेच शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आलेल्या असल्याने ऑनलाईन अर्ज करता न आलेल्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता सरळसेवा भरतीसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी १० दिवसांची मुभा देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!