राजकारण
Trending

“मी पुन्हा येईन”वरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं ! ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवा, अजितदादांनाही टोला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७- प्रधानमंत्री यांनी सांगितले काल दिल्लीमध्ये १५ ऑगस्टचे भाषण करत असताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल त्यांनी सांगितले, माझी त्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचे नाव देवेंद्र फडणवणीस त्यांनी सांगितले होते मी पुन्हा येईन आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्यामध्ये देवेंद्र यांचे मार्गदर्शन होते का ? त्यांनी सांगितले होते मी पुन्हा येईन ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही खालच्या रॅकवर आता प्रधानमंत्री म्हणतायेत की मी पुन्हा येईन ते पुन्हा येणे देवेंद्र यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल मग आज आहे त्या पदाच्या खाली कुठे जायचे याचा विचार करून तुम्ही पुढचे पाऊल टाका, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. बीडमध्ये आयोजित जाहीर सभेत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व राज्यातील भाजपा प्रणित सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडलण्यानंतर शरद पवार यांनी येवला येथे पहिली सभा घेऊन स्पष्ट भूमीका मांडली. त्यानंतर मराठवाड्यात आज प्रथमच बीडमध्ये त्यांनी जाहीर सभा घेऊन अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून सडकून टीका केली. शरद पवार यांनी केलेले भाषण त्यांच्याच शब्दात…  आजच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील मंचावरील सर्व मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू-भगिनींना..!

बीडची जनता त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी असते- बऱ्याच दिवसातून आज बीडला संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहळा आयोजित केला त्याला हजर राहण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी तुमचा उत्साह बघितला एवढी उपस्थिती पाहिली. त्यामुळे मला जुन्या काळाची आठवण या ठिकाणी झाली आणि ती जुन्या काळाची आठवण लोकांमध्ये राहणारे व्यक्ती किंवा नेतृत्व हे निष्ठेच्या बाबतीत जरी तडजोड करत असले पण ही बीडची जनता त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी असते. आणि संदीप यांनी ते दाखवले आणि त्याची मला आठवण देखील झाली की अनेक वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो त्या वेळेला असा एक प्रसंग आला महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या तर्फे आम्ही सर्वजण त्यांच्या विचारांनी काम करत होतो. त्यावेळी असा एक काळ येऊन गेला की खऱ्या नेतृत्वापेक्षा एक वेगळी भूमिका काही लोकांनी मांडायला सुरुवात केली. सामान्य लोक अस्वस्थ होते, पण या जिल्ह्यात या जिल्ह्याचे नेतृत्व केसरकाकू क्षीरसागर यांच्यातच होते, आणि काकूंनी भूमिका घेतली. कोणी काहीही भूमिका घेतली तरी मी नेत्याच्या विचारांशी तडजोड करणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागले, मेहनत घ्यावी लागली तरीही मी तडजोड करणार नाही. आणि तशी स्थिती त्यांनी त्या काळात केली आणि ती स्थिती आज त्यांच्या नातूंनी पार पाडले याचा मला सार्थ अभिमान आहे.

शेतकरी, कष्टकरी काळ्या आईची सेवा करणारा अत्यंत अडचणीत, सरकारला चिंता नाही- आत्ता जयंतरावांनी सांगितलं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. देशातले चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्टकरांच्या विचारांची जपवणूक ही त्यांच्या तत्वात नाही, जात, धर्म आणि भाषा यामधून समाजात अंतर कसे वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. जयंतरावांनी आता सांगितले, किती प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे, आज पेट्रोल डिझेल याच्या किमती कुठे गेल्या आहेत हे तुम्हाला माहितीय, उत्तम शेती करायला करण्यासाठी पाऊस पाणी हवाय आणि नंतर उत्तम बी बियाणे हवेत. आज खताच्या किंमती कुठे गेल्यात शेतकऱ्याला आज काय मिळत आहे न परवडणारी स्थिती आज संबंध शेतीची आणि अर्थव्यवस्थेची झालेली आहे. आणि त्यामध्ये हा शेतकरी कष्टकरी काळ्या आईची सेवा करणारा हा अत्यंत अडचणीत आहे. आणि या सरकारला त्यासंबंधी चिंता नाही. कायदा आणि सुव्यवस्था काय ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची असते झालं आज काय चित्र दिसते याचा उल्लेख तुम्ही त्यांनी केला.

पाकिस्तान व चीनची नजर हिंदुस्थानावर भारतावर चांगली नाही- णिपूर हा या देशाचा उत्तरेकडचा भाग अनेक राज्य आहेत. तिथे मणिपूर आहे. नागालँड आहे सिक्कीम, अरुणाचल आहे. छोटे छोटे राज्य पण अत्यंत महत्त्वाचे राज्य त्या राज्यांच्या पलीकडे प्रत्येक राज्याच्या शेजारी एक पाकिस्तान आहे किंवा चीनचे जे आहे आणि या दोन्ही देशांची नजर हिंदुस्थानावर भारतावर ही चांगली नाही आहे. संकट आलं तर इथून काय होईल याची खात्री देता येत नाही आणि सतर्क राहण्याचे काम भारतीय सैन्याला नेहमी करावं लागतं. मणिपूरच्या पलीकडे दुसरा देश आहे परंतु आजचे मणिपुर वेगळे आहे, समाजा समाजामध्ये भांडण झाली गावागावांमध्ये अंतर पडले. एक वर्ग विरोधात दुसरा वर्ग हल्ले होत आहेत. उद्योग नष्ट केले जात आहेत, स्त्रियांच्या अब्रूची धिंड काढली जाते, आणि हे सर्व होत असताना सुद्धा देशाचे सूत्र असलेले भाजपचे सरकार कोणत्याही प्रकारचे पाऊल टाकत नाही.

मणिपूरला जायची आवश्यकता होती पण तिकडे ढुंकूनही पाहण्याची त्यांना गरज वाटली नाही- देशाचा प्रधानमंत्री इतक्या भगिनींशी त्या ठिकाणी दुर्दशा झाल्यानंतर, घरे दारे पेटवल्यानंतर, समाजातील लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जायची आवश्यकता होती पण तिकडे ढुंकूनही पाहण्याची त्यांना गरज वाटली नाही. पार्लमेंटचे अधिवेशन सुरू झाले, त्याआधी दोन दिवस आधी तीन मिनिटे फक्त ते मणिपूरवर बोलले आणि अविश्वासाचा ठराव आल्यानंतर आणखी चार पाच मिनिटे बोलले पण त्या भगिनींचे दुःख हे देशाच्या प्रधानमंत्री यांनी समजून घेतलं नाही. आज तशी स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळते.

तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेले सरकार उध्वस्त करता – लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकार पाडण्याचा उद्योग केला जातो. गोव्याचे सरकार पाडले होते, कर्नाटकचे सरकार पाडलं होतं, उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रातले सरकार पाडले होते, कमलनाथच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशचे सरकार पाडले होते तुम्ही स्थिर सरकार देण्याची घोषणा करता आणि लोकांनी निवडून दिलेली सरकारी केंद्राची सत्ता वापरून उध्वस्त करता आणि सामान्य माणसाचे जीवन तुम्ही एका दृष्टीने उध्वस्त करता आणि म्हणून ही सर्व आव्हान आपल्या पुढे आलीत. ज्यांना आपण सत्ता दिली ते सत्ता दिलेले घटक योग्य पद्धतीने वागत नाही कुठे काहीही होत आहे.

१८ लोक २ दिवसात मृत्युमुखी पडतात आणि हे राज्य सरकार बघ्याची भूमिका घेते- गेल्या आठवड्यात त्यांच्या शहरांमध्ये ठाणे शहरात सरकारचे असलेले हॉस्पिटल आणि सरकारच्या त्या हॉस्पिटलमध्ये १८ लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला. त्याच्यात आया बहिणी होत्या. त्याच्यात वडीलधारी होते, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आजारी माणसाला आधार देण्याची जबाबदारी त्या हॉस्पिटलमध्ये १८ लोक २ दिवसात मृत्युमुखी पडतात आणि हे राज्य सरकार बघ्याची भूमिका घेते याचा अर्थ राज्य कुठे चाललाय कसं चाललंय यासंबंधीचा अनुभव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. आणि म्हणून वेळ आलेली आहे ती वेळ या चुकीच्या लोकांना आवरायचं आहे.

सत्तेचा गैरवापर- आज व्यासपीठावर काही लोक आहेत. आमच्या सोबत राजकारणात नव्हते पण काहीतरी मुद्दा काढला आणि महिनोन्महिने त्यांना तुरुंगात टाकले. आणि विशेषतः या गोष्टी अधिक होत आहेत सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात डांबून कुणी या ठिकाणी वेगळे राजकारण करत असेल तर ठीक आहे तुम्ही आज करत आहेत पण एक दिवशी हे सामुदायिक शक्ती एक संघ झाली तर हे असले राजकारण उलथून टाकण्याचे कधीही वेळ लागणार नाही आणि ते करायला आम्ही सर्वजण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे.

माझं वय झालंय म्हणताय तुम्ही माझं काय बघितलं – जिल्ह्याचे नेते काय झालंय त्यांना माहिती आहे. एका नेत्याने सांगितले एक कुणीतरी आमचा सहकारी हा पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झाले. कालपर्यंत ठीक होता. काय माहिती त्यांना सांगितलं कोणीतरी काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं पवार साहेबांचा आता वय झालंय आणि त्यामुळे आपल्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे आता एवढेच सांगतो मी माझं वय झालंय म्हणताय तुम्ही माझं काय बघितलं त्यामुळे तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यानंतर काय होते एकदा या जिल्ह्याच्या मातृभूमीत येऊन आम्ही केले होते इथल्या तरुण पिढीच्या मदतीने एकेकाळी केले होते आता ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचं आहे तर जा पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी तरी ठेवायचा प्रयत्न करा आणि नाही केलं तर लोक तुम्हाला योग्य प्रकारची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

कोणते बटन दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हा निकाल जनता ठरवल्याशिवाय राहणार नाही- मी काय अधिक बोलण्यासाठी उभा नाही. तक्रार माझी हीच आहे, कालच्या निवडणुकीमध्ये मदत घ्यायची. लोकांनी निवडून दिले लोकांनी भाजपचा पराभव केला आणि भाजपचा पराभव करून तुम्ही सत्तेत आलात आणि आज त्या भाजपच्या सोबत बसायची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहात. आज तुम्ही हे करत आहात पण उद्याच्याला ज्यावेळी मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल, त्यावेळी कोणते बटन दाबायचे आणि तुम्हाला कुठे पाठवायचे हा निकाल जनता ठरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.

प्रधानमंत्री यांनी सांगितले काल दिल्लीमध्ये १५ ऑगस्टचे भाषण करत असताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल त्यांनी सांगितले, माझी त्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचे नाव देवेंद्र फडणवणीस त्यांनी सांगितले होते मी पुन्हा येईन आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्यामध्ये देवेंद्र यांचे मार्गदर्शन होते का ? त्यांनी सांगितले होते मी पुन्हा येईन ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही खालच्या रॅकवर आता प्रधानमंत्री म्हणतायेत की मी पुन्हा येईन ते पुन्हा येणे देवेंद्र यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल मग आज आहे त्या पदाच्या खाली कुठे जायचे याचा विचार करून तुम्ही पुढचे पाऊल टाका एवढेच या ठिकाणी सांगतो आजचा हा सोहळा आज संदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय कष्टाने आणि तुमच्या सर्वांच्या साथीने हा ऑर्गनाईज केला त्याबद्दल त्यांना व तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो….!

Back to top button
error: Content is protected !!