राजकारण
Trending

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा फेटाळला ! पवारांचा राजीनामा एकमतानं नामंजूर : पुफुल्ल पटेल

मुंबई, दि. ५- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा पक्षाच्या निवड समितीने एकमताने फेटाळला. देशभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी या पदावर कायम राहावं, अशी विनंत त्यांना करण्यात येणार असल्याचा सर्वानुमते ठराव घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. समितीने घेतलेल्या या ठरावावर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रदेश कार्यालयात समितीची ही तातडीची बैठक पार पडली. त्यात हा ठराव घेतला असून याची माहिती शरद पवार यांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या समितीची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या घोषणेमुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्का बसला होता. कार्यकर्ते आणि नेते यांच्या आग्रहामुळे पवारांनी एका समितीची घोषणा केली. या समितीची आज बैठक पार पडली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहावं. याशिवाय पुस्तक प्रकाशनाप्रसंगी त्यांनी राजीनामा देण्याचा जो मनोदय व्यक्त केला होता, तो नामंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज दिली. समितीने घेतलेल्या या ठरावासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या पदावर कायम राहण्याची विनंती करणार आहोत, यासाठी त्यांची भेट घेऊन केंद्रीय व राज्य समितीतील सदस्य त्यांना गळ घालण्यात येणार असल्याची माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कायम ठेवावे, अशी मागणी वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, असे पवार यांनी गुरुवारी सांगितले होते. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे पुढील अध्यक्ष होऊ शकतात, असा राजकीय गोटात तर्क लावला जात होता, मात्र समितीने घेतलेल्या ठरावात याचा उल्लेखही नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची पवारांनी केलेल्या घोषणेवर पुनविचार करण्यासाठी आज, शुक्रवारी वरिष्ठ नेत्यांच्या समितीची बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्ष निवडीसाठी शरद पवार यांनी 18 सदस्यांची समिती यापूर्वीच गठित करण्यात आली होती. या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव मांडला.

राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाच्या भवितव्यासाठी आणि नवे नेतृत्व उभे करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात जाहीरपणे घेतला होता. या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. याची कोणतीही पूर्वकल्पना कार्यकर्ते, नेते यांना नव्हती.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला निर्णय परत घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्राबाहेरच आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यांच्यावर आग्रह टाकण्यात आला. दरम्यान, वायबी चव्हाण केंद्राबाहेर पवार म्हणाले की, येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेऊ आणि कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

त्यांना पक्षप्रमुखपदी कायम ठेवण्याची मागणी करत पवारांचे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. जयंत पाटलांसह अनेकांना अश्रु अनावर झाले होते. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण शुक्रवारी महाराष्ट्राबाहेरील पक्षाच्या काही सहकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एक-दोन दिवसांत मी अंतिम निर्णय घेईन, असेही ते म्हणाले होते.

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने पवारांनी किमान २०२४ पर्यंत पक्षाचे नेतृत्व करावे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची जाहीर घोषणा केली होती.

पवार म्हणाले होते, ‘माझा राज्यसभा सदस्य म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. यादरम्यान मी पक्षात कोणतेही पद न घेता महाराष्ट्र आणि देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. 1 मे 1960 पासून खूप काळ लोटला आहे आणि मला एक पाऊल मागे घेणे आवश्यक आहे. मी तुमच्यासोबत असेन, पण पक्षप्रमुख म्हणून राहणार नाही.

पवारांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे राजकीय गोटात भूकंप झाला. खासकरून महाविकास आघाडीबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली. पवारांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला दूर ठेवण्यासाठी भिन्न विचारांच्या पक्षांनी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून देशाच्या राजकारणात इतिहास नोंदवला. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, शिवसेनेतील बंडाने महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने मोठा धक्का बसला. आणि आता पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्षाचा राजीनामा दिल्याने हा दुसरा धक्का महाविकास आघाडीला बसल्याचे बोलले जात आहे.

Back to top button
error: Content is protected !!