महाराष्ट्र
Trending

शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने देण्याचे निर्देश, सहकार विभागाने पाठपुरावा करून अहवाल सादर करावा !

मुंबई, दि. २५ : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

सहकार मंत्री सावे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष खोरगडे, नितीन गायकवाड, शिंगाडे, विशेष कार्य अधिकारी तथा अवर सचिव श्रीकृष्ण वाडेकर, साखर संचालक उत्तम इंदलकर, कक्ष अधिकारी अनिल चौधरी, राहुल शिंदे उपस्थित होते, तर साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री सावे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कार्यवाही करावी. राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन, पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रशासन आणि सनियंत्रणासाठी हा जबाबदार असून या क्षेत्राला सक्षम करून सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.

त्यानुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. या संस्थांच्या ऑनलाइन नोंदणीवर उपनिबंधक कार्यालयाने भर द्यावा. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांना मार्गदर्शन करावे. तसेच नवीन सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी प्रमाणित पद्धत तयार करून तिचा वापर करावा, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सावे यांनी शेतकरी कर्जमाफी योजना, अटल अर्थसाहाय्य योजना, सहकारी पाणीपुरवठा संस्था अनुदानाचा आढावा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी भरती पॅनल, सहकारी पतसंस्था तपासणी लेखापरीक्षण व निधी वितरण, बंद, अवसायानातील साखर कारखाने, सहकार विभागाचे तालुका व जिल्हास्तरी कार्यालयांचे शासकीय जागेत स्थलांतर, साखर गाळप हंगाम, सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदांचा आढावा घेतानाच विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश दिले. अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

Back to top button
error: Content is protected !!