आम्ही आमच्या चटण्या भाकरी खातोत अन् इथं उघड्यावर झोपतोत ! आमच्या आंदोलनाला डाग लावल्यास टंमरेलच वाजवणार, मनोज जरांगे पाटलांचा सनसनीत इशारा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ -: मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून राजकारण होत असल्याच्या आरोपावर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरोप करणार्या राजकारण्यांना अस्सल मराठवाडी भाषेत सुुनावलं. आम्ही आमच्या चटण्या भाकरी खातोत अन् इथं उघड्यावर झोपतोत. आमच्या आंदोलनाला डाग लावू नका. तोह टंमरेलच वाजवील, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला राजकीय रंग चढवणार्या राजकारण्यांना सुनावलं.
आज सायंकाळी पत्रकार परिषद घेवून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यासाठी चार दिवसांच्या दिलेल्या अल्टिमेटंमचा पुनुच्चार केला. काय पुरावे लागतील ते सर्व पुरावे देण्यास मी तयार आहे. पण सरकारने आता वेळ मागू नये अन् उरलेल्या तीन दिवसांत जीआर काढावा असा इशारा दिला. दरम्यान, या आंदोलनाच्या आडून राजकारण होत असल्याच्या आरोपावर मनोज जरांगे म्हणाले की, मी या गोष्टीला ज्यास्त महत्त्व देत नाही. माझ्या समाजाला माहित आहे, माझा समाज काय आहे अन् मी काय आहे. राजकारण घुसलं, फसलं हे उद्योग आरोप करणार्यांनीच करावे. आमच्या या लफड्यात पडून नको तू. मराठ्यांच्या पोरांनी हे आंदोलन उभा केलेलं आहे. हे काही राजणारण्यांनी फाजकारण्यांनी उभा केलेलं आंदोलन नाही. आंदोलन करणारी जातीवंत पोरं आहेत ही. सर्व राज्यातील आणि मराठवाड्यातील. गरीबाची पोरं आहेत ही. आम्ही आमच्या चटण्या भाकरी खातोत अन् इथं उघड्यावर झोपतोत. आमच्या आंदोलनाला डाग लावू नका. तोह टंमरेलच वाजवील मी.. आरोप करणार्यांना मनोज जरांगे पाटलांनी अस्सल मराठवाडी बोली भाषेत सुनावलं.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषणस्थळीच सलाईन चढवले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही या भूमीकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारला चांगलाच घाम फुटला असून मंत्रालयात सरकार व प्रशसनाच्या हालचाली वाढल्या आहेत.
दरम्यान, आज उपोषणाचा नववा दिवस असून आज, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका जाहीर केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, संपूर्ण मराठा समाजारा सरसकट आरक्षण देण्याऐवढे पुरावे माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे मी सरकारला देण्यास तयार आहे. मी कालच सरकारला चार दिवसांचा वेळ दिला आहे. सरकारने पुरावे नाही, दस्ताऐवज जमा करण्यासाठी वेळ मागू नये. यासाठीचा त्यांचा वेळ वाचावा म्हणून हे सर्व पुरावे मी त्यांना द्यायला तयार आहे. सरकार ज्या ठिकाणाहून हे पुरावे जमा करणार आहे तेथूनच हे सर्व पुरावे मी जमा केले आहे. यासाठी सरकारने हे पुरावे माझ्याकडून घेऊन जावे व मी दिलेल्या वेळेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी करतानाच सरकारने आता वेळ मागू नये, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
सरकारला चार दिवसांचा वेळ मी दिला आहे. यापैकी आज एक दिवस संपत आहे. मराठा समाजाला सरकट आरक्षण देण्याएवढे पुरावे आम्ही जमा केले आहे. हे सर्व पुरावे माझ्याकडे असून सरकारला ते द्यायला मी तयार आहे. राज्यपालाच्या परवानगी घेवून वटहूकुम काढावा. सरकारने आता कारणे सांगू नये. एका दिवसांत अध्यादेश काढण्याऐवढे पुरावे मी सरकारला देतो. या पुराव्यांच्या आधारे सरकार आता एका दिवसात अध्यादेश काढू शकतं. यामुळे सरकारने यावे आणि पुरावे घेवून जावे. मात्र, सरकारने आता वेळ मागू नये, असेही जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावले.
नऊ दिवसांपासून जरांगे पाटील यांनी अन्नत्याग केला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने काल, ४ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती त्यावेळी जरांगे पाटील यांनी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जर चार दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर पाणीसुद्धा पिणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता याचा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe