महाराष्ट्र
Trending

मनोज जरांगे पाटील २५ ताखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, गावांत पुढाऱ्यांना फिरकू देणार नाही ! महाराष्ट्रातील प्रत्येक झेडपी सर्कलमध्ये ५ कोटी मराठे साखळी उपोषण करणार !!

अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम, उरले दोन दिवस

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी सरकारनं जो अवधी घेतला होता तो २४ तारखेला संपत आहे. २४ तारखेच्या आत राज्य सरकारनं जर मराठा आरक्षण जाहीर केलं तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण करणार असून अन्न पाणी आणि कोणताही उपचार घेणार नसून कठोर उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा संर्घर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज केली. यामुळे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडे अवघा दोन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पत्रकार परिषद घेवून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षमासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे कोट्यवधी मराठ्यांच्या जनसागराला उद्धेशून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात २४ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता व येत्या २२ ऑक्टोंबर रोजी जाहीर पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षणासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी जाहीर घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा जनसागराला संबोधीत करताना केली होती.

१४ तारखेच्या घोषणेनुसार आज, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवताना पत्रकार परिषदेत सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं ३० दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, मराठा समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत ४० दिवसांचा वेळ दिला होता. दिलेला वेळ संपत येत असल्याने त्याबाबत पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट करत आहोत. राज्य सरकारनं जर २४ पर्यंत मराठा सरकारच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून मी मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. त्या उपोषणात पाणी, अन्न व उपचार घेणार नाही. एकदम कठोर उपोषण आरक्षणासाठी सुरु करणार आहे.

राजकीय नेत्याला फिरकू देणार नाही- आमच्या गावात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला येवू दिलं जाणार नाही. आरक्षण घेवूनच गावात यायचं नाही तर आमच्या गावाचा शिवही ओलांडयचा नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला.

जिल्हा परिषद सर्कलनिहाय साखळी उपोषण- राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये एका ठिकाणी साखळी उपोषणं करण्यात येणार आहे. त्या त्या सर्कलमधील गावांच्या वतीने एकाच ठिकाणी ताकदीनं साखळी उपोषण महाराष्ट्रभर सुरु केलं जाणार आहे. यासाठी सर्कलनिहाय गावांनी तयारी सुरु केली असल्याची माहितीही मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मराठा समाज एकत्र येवून कॅण्डल मार्च काढणार- याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावांत प्रचंड संख्येने मराठा समाज एकत्र येवून कॅण्डल मार्च काढणार आहे. हे शांततेचं आदोलन सुरु झाल्यानंतर हे सरकारला झेपनार नाही. २५ तारखेनंतर सरकारला पुढील आंदोलन पेलणार नाही. कारण दोन टप्प्ये आंदोलनाचे पाडले जाणार आहे.

५ कोटी मराठे वज्रमुठ आवळणार- माझं आमरण उपोषण आणि सर्कलचे उपोषण हे महाराष्ट्रातील ५ कोटी मराठे चालवणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ही सरकारला पेलणारी आणि झेपणारी नसणार आहे. २५ तारखेला पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे २४ तारखेच्या आत आरक्षण जाहीर करा, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला.

१४ तारखेच्या अंतरवाली सराटी येथील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांच भाषण- एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल ! येत्या १० दिवसांत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाहीतर छाताडावर बसून आरक्षण घेवू- मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जनसागर उसळला, सळसळत्या उत्साह

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. येत्या १० दिवसांत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या नाहीतर छाताडावर बसून आरक्षण घेवू असा इशारा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला. २४ ऑक्टोबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर २२ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. आज सरकारला विनंती आहे की, मराठा समाजाची भावना लक्षात घ्या येत्या १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा ४० व्या दिवशी सांगू… तसेच पुढे काय होईल याची जबाबदारी सरकारचीच राहील. एकच सांगतो लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे. निवांत रहा टेन्शन घेवू नका. आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही, असा शब्दात जरांगे पाटलांनी विराट मराठा समाज बांधवाच्या लाखोंच्या जनसमुदायाला दिला.

विराट इशारा महासभेला संबोधीत करताना १४ ऑक्टोंबर रोजी जरांगे पाटील बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून या सभेला जोरदार टाळ्यांच्या आवाजात सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांपासूनचा हा संघर्ष आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला असल्याची आठवण यावेळी सूत्रसंचालकाने करून दिली आणि एकज गर्जना केली. एक मराठा त्याचवेळी जनसमुदायामधून बुलंद आवाज आला लाख मराठा. मनोज जरांगे पाटील यांनी आज अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या. आज भाषण होणार नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीलच सांगितले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा-

१) आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.
२) कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणार्या हरामखोर नराधमाला लवकर फाशी द्यावी
३) मराठा आरक्षणासाठी बलीदान देणार्या ४५ समाज बांधवांना सांगितलेला निधी व सराकारी नौकरी तातडीने द्यावी
४) मराठा समाजाचा सर्वे करावा
५) सारथी संस्थेमार्फत पीएचडी कराणार्या विद्यार्थ्यांना ज्यास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे
६) ५० टक्केच्या वर आरक्षण आम्ही घेणार नाही.
७) सरकारनं जे गुन्हे अजून मागे घेतले नाही ते तातडीने मागे घ्यावे

उरलेल्या १० दिवसांत आरक्षण द्या नाहीतर ४० व्या दिवशी सांगू- या प्रमुख मागण्या सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील म्हणाले की, या ऐतिहासीस सभेचा घराघरातील प्रत्येकजण साक्षिदार झाला आहे. घराघरातून प्रत्येक मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे. सरकारला आज विनंती आहे. ४० दिवसांपैकी ३० दिवस झाले जनसागराचं एकच म्हणनं आहे राहिलेल्या १० दिवसांत आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप सरकारला जो शब्द दिला त्या शब्दावर मराठा समाज आजही ठाम आहे. ४० दिवस एक शब्दही मराठा आरक्षणावर सरकारला विचारणार नाही. तुमच्या हातात आणखी १० दिवस आहे. या १० दिवसांत आरक्षण नाही दिलं तर मग ४०व्या दिवशी सांगू.

मराठ्यांची औलाद शब्द मोडीत नाही- माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार आहे. मराठ्यांची औलाद शब्द मोडीत नाही. सर्व पोलिसांनी बघीतलं की मराठा समाज शांततेत आले. तुम्हाला विनंती करून सांगतो भावांनो पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं आपणही त्यांना सहकार्य करायचं. आपल्या रस्त्यावरील गावकर्यांनीही सर्वांसाठी बरंच काही केलं. त्यांच्यासाठी पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. त्यांचाही मी आभारी आहे.

सरकारने गठित केलेल्या समितीचं काम आता बंद करा- तुम्ही रात्रंन दिवस जे काबाडकष्ट करत आहात त्याचं चीज करण्याची वेळ आज आली आहे. शेवटी विनंती करून सांगतो की, मराठा समाजासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होते की चार दिवसांत कायदा होत नाही. आता ३० दिवस झाले. ५ हजारांपेक्षाही ज्यास्त कुणबीचे पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर करा.

आग्या मोहळ शांत आहे हे काय उठलं र बुआ… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला या कोट्यवधी मराठा समाजाच्यावतीने हात जोडून सांगतो या मराठा समाजाची विनाकारण हाल अपेष्टा करू नका. या गोर गरीब समजाला केंद्रानं आणि राज्यानं तातडीने निर्णय घेवून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जाहीर निर्णय करावाच. १० दिवसांपेक्षा वाट बघण्याची आता आमची तयारी नाही. कायदा सांगतो व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या. विदर्भातल्या शेती करणार्या मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे सरकारला विनंती आहे राज्य व केंद् यांनी मिळून हा विषय गांभीर्याने घेवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं. आग्या मोहळ शांत आहे हे काय उठलं र बुआ आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

२५० एकरवर एक मराठा लाख मराठा अन् ५० मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा या गगनभेदी घोषणा- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक भव्य दिव्य अशी सभा आज, १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी लाखो मराठा समाज बांधवांच्या उपस्थित पार पडली. तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक, जंगी, भव्य दिव्य अशा या सभेने सरकारच्या पोटात गोळा आला. सुमारे २५० एकरवर एक मराठा लाख मराठा अन् ५० मधून आरक्षणाचा किल्ला आता जिंकायचा या गगनभेदी घोषणांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले. नजर जाईल तिकडे फक्त अन् फक्त मराठा समोज बांधव दिसत होते. एखाद्या नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी जमली नसेल एवढी गर्दी या सभेला जमली. सर्व समाज बांधव स्वयस्फूर्तपणे या सभेसाठी आले होते.

१७ दिवस उपोषण केल्यानंतर सरकारला जाग- २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. १७ दिवस उपोषण केल्यानंतर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्यातील उपोषणस्थळी अंतरवाली सराटी येथे १४ सप्टेंबर रोजी आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून मला ३० दिवसांचा कालावधी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते तथा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ३० दिवसांचा जो अवधी मागितला होता त्यास मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून तूर्त उपोषण मागे घेतले होते.

त्यानंतरही मनोज जरांगे पाटील स्वस्थ बसले नाही. महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला. ३० सप्टेंबरपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. सुमारे १३ जिल्ह्यांत २०० ठिकाणी त्यांनी मराठा समाज बांधवाशी संवाद साधला. त्यांच्या सभेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद राज्यकर्त्यांच्या उरात धडकी भरवणारा ठरला. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारासही सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला ३० दिवसांचा अल्टिमेटम आज १४ ऑक्टोबर रोजी संपला आहे. (याशिवाय १० दिवसांचा अवधी वाढवून दिला होता. म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी अल्टिमेटमची मुदत संपत आहे.

या ऐतिहासिक सभेचा स्टेज २० बाय ३६ या आकारात होता. मनोज जरांगे पाटील यांच्या एंट्रीसाठी ६०० फुटांचा रॅंपची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे २५० एकरवर ही भव्य सभा आयोजिली आहे. लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने १० हजार स्वयंसेवक कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याने मैदानात १० ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली. याशिवाय ३५ कार्डियाक रुग्णवाहिका, १०० रुग्णवाहिका ,३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ, अग्निशमक दलाच्या १० गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी २० एलईडी स्क्रिनही लावण्यात आल्या होत्या.

Back to top button
error: Content is protected !!