राजकारण
Trending

शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट: सरकार विरोधात लिहिले तर यंत्रणेकडून न्यूज चॅनलला धमकावण्याचा धक्कादायक प्रकार, बातमी काढून टाका नाहीतर परिणाम भोगावे लागणार !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या बैठकीत अनेक धक्कादाय गौप्यस्फोट करून प्रसार माध्यमांवर कशा पद्धतीचे प्रेशन आहे याचे काही किस्से सांगितले. एखाद्या चॅनलमध्ये सरकारबद्दल, देशाच्या प्रमुख लोकांबद्दल काही टिप्पणी कोणी केली तर लगेच त्यासंबंधीचा मेसेज एका यंत्रणेकडे दिला जातो. आणि तो मेसेज त्यांच्याकडून एका चॅनलच्या संबंधित आला की ताबडतोब शासनामधल्या एका मोठ्या व्यक्तीच्याकडून त्या चॅनलच्या यंत्रणेच्या प्रमुखाला फोन जातो. आणि तुमच्या चॅनलवर ही बातमी लिहिलेली आहे ही बातमी ताबडतोब हटवून टाका, आणि पुन्हा हे घडलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशा पद्धतीचे वातावरण सध्या देशभरात असल्याची धक्कादायक माहिती शरद पवार यांनी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पुणे येथे आयोजित पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या बैठकीत शरद पवार यांनी केलेले भाषण वाचा त्यांच्याच शब्दात… सन्माननीय व्यासपीठ, महाराष्ट्राच्या जिल्ह्या- जिल्ह्यातुन आलेले तुम्ही सर्व तरुण मित्र. आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक विभाग केलेत. ते विभाग तरुणांचं असेल, महिलांचं असेल, विद्यार्थ्यांचं असेल, युवतींचं असेल. शेती आणि या संबंधीचा विचार करणारा असेल. कष्टकरी कामगारांचा असेल. या सगळ्यांमध्ये सोशल मीडिया संबंधीचा विचार हा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण त्या रस्त्याने आता जायला लागलो आहे. ही आजची बैठक किंवा मेळावा ही त्या संदर्भातला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे सहज मार्ग असतील, आणि त्यासाठी जी काही साधनं वापरली जात असतील त्याच्या आणि आपल्या सहकाऱ्यांचा सुसंवाद हा झाला पाहिजे. तो सुसंवाद ठेवून दोन गोष्टी दोन मार्ग त्याचे समजून घ्यायचेत. एकतर जगात काय घडतंय, देशात काय घडतंय, निवडणुकांच्या बाबतीत काय घडतंय आणि काय लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. त्याचा विचार करण्याची ही साधनं आहेत.

सोशल मीडिया याच्याकडे कोणी आता दुर्लक्ष करू शकत नाही. त्याच्यात दोन भाग आहेत. राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून काही साधनांचा उपयोग करून घेतात. तुम्हाला एकच माहिती सांगू इच्छितो, मी नाव सांगत नाही पण देशातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या जागेवर ज्या काही व्यक्ती आहेत त्यातल्या एका व्यक्तीचा परिसंवाद वेगळ्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर केला जातो. त्यांनी केलंय काय? त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये दोनशे टेलिव्हिजन बसवले आहेत. प्रत्येक टेलिव्हिजनला एक व्यक्तीची नेमणूक केली. आणि ज्या बातम्या असतात. ते जे टेलिव्हिजन आहेत ते हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत व अन्य भाषांमध्ये आहेत. आणि त्याचं न्यूज सेक्शन हा जो असेल तो बारकाईनं त्याच्यावर लक्ष ठेवून असेल.

आणि एखाद्या चॅनलमध्ये सरकारबद्दल, देशाच्या प्रमुख लोकांबद्दल काही टिप्पणी कोणी केली तर लगेच त्यासंबंधीचा मेसेज एका यंत्रणेकडे दिला जातो. आणि तो मेसेज त्यांच्याकडून एका चॅनलच्या संबंधित आला की ताबडतोब शासनामधल्या एका मोठ्या व्यक्तीच्याकडून त्या चॅनलच्या यंत्रणेच्या प्रमुखाला फोन जातो. आणि तुमच्या चॅनलवर ही बातमी लिहिलेली आहे ही बातमी ताबडतोब हटवून टाका, आणि पुन्हा हे घडलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

आज लोकशाही म्हणतो आपण, स्वातंत्र्य म्हणतो आपण, लिखाणाचं, बोलण्याचं सगळं आहे. आणि हे स्वातंत्र्य हा जो मूलभूत अधिकार आहे. जो तुमचं मत हे टेलिव्हिजन वरून कुणावर टीका करणारं गेलं तर त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केला जातो. सोशल मीडिया हा वेगळा भाग आहे. आणि मी जे सांगतोय ते सबंध चॅनलचा वापर ज्या पद्धतीने केला जातो. आणि आज हे काम देशात मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. जे कोणी चॅनलचे मालक आहेत, त्यांच्याशी कधी कधी आम्हाला सुसंवाद करण्याची संधी मिळते. त्यावेळेला ते एकच गोष्ट सांगतात, की हे मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला दमदाटी केली जाते ते कसं थांबवता येईल तेवढे बघा. आणि म्हणून महाराष्ट्राचा नाही तर देशाचा पार्लमेंट किंवा राज्यसभा इथे जेव्हा संधी मिळते त्या वेळेला आपले लोकं हा प्रश्न कटाक्षाने मांडत असतात.

आणि जर याला उत्तर द्यायचं असेल तर प्रभावी सोशल मीडिया यंत्रणा तयार करणे हे एकमेव पर्याय आहे. मला अतिशय आनंद आहे की, आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यातून तुम्ही या ठिकाणी आलात. सकाळपासून काही लोकांची भाषणं ऐकली, आताही काही लोकांची भाषणे आपण ऐकली. आणि तुमची विंग ही मजबूत झाली तर माझी खात्री आहे की चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर ज्या ठिकाणी होतोय त्याला आवर घालण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे आणि त्यासाठीच्या यंत्रणेचा वापर करायचाय.

मला वाटतं एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे आता आपण सोशल मीडिया आणि त्या बाबतीत पक्षाची काही धोरणं, काही लोकांच्या जबाबदाऱ्या याचा निकाल तर आपण देऊ. पण आज तुम्ही प्रत्येकाने हा निकाल घेता येईल का बघावं की दर महिन्याला तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या भागात तुमचे जे मित्र आहेत, तुमचे सहकारी आहेत, आणि जे सोशल मीडियात नाहीत असे नवीन दहा लोकांना दर महिन्याला तयार करणे. जर तुम्ही दहा लोकांना दर महिन्याला तयार करू शकलात तर आता तुमची या ठिकाणची उपस्थिती हे काहीतरी आठशेच्या आसपास आहे. जर दहा घेतले तर दर महिन्याला आपण आठशे वरून आठ हजारावर जाऊ. आणि आठ हजारावर गेल्यानंतर आणखी दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही किती जाल यासंबंधीची कल्पना तुम्हाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!